Tuesday, March 27, 2012

जंगलचा कायदा..

माणसाची उत्पत्ती प्राण्यांपासून झाली या गोष्टीचा प्रत्यय माणूस आजही पुन्हा पुन्हा करून देत असतो. हजारो वर्षांचा प्रवास करत माणूस जंगलातून शहरापर्यंत येऊन पोचला खरा पण त्याच्या रक्तात आजही तो जंगलचा कायदा चांगलाच भिनून राहिलाय आणि वेळोवेळी संधी मिळताच माणूस त्याच्यातल्या या जनावराला वाट मोकळी करून देत असतो.
कळप करून राहणे हा जंगलचा मुलभूत नियम माणूस आजतागायत न चुकता पाळत आलाय. आखूड शेपटीचे, लांब शिंगाचे, उंच मानेचे, जाड पायाचे अशा एक  ना  हजार गोष्टी प्रमाण मानत माणसातली ही जनावरं आपआपला  कंपू करून राहत असतात.
आता कळप म्हणला कि त्याबरोबर त्याची स्वतःची अशी संस्कृतीही आलीच. संस्कृती कसली?आचारसंहिताच ती! अमुक एखादी गोष्ट करणे म्हणजे पुण्य, तमुक एखादी गोष्ट करणे म्हणजे पाप वगैरे वगैरेची नियमावली. आता कळपाप्रमाणे हे नियम बदलत असतात म्हणा पण एक नियम मात्र सगळीकडे सारखाच असतो, तो म्हणजे एका कळपातला प्राणी हा चुकूनही दुसऱ्या कळपात जाता कामा नये. समजा एखादं जनावर वाट चुकून वेगळ्या कळपात शिरलंच तर मग त्याला जंगलच्या दुसऱ्या आणि अत्यंत महत्वाच्या कायद्याची ओळख करून देण्यात येते तो म्हणजे शिकार!!!
दरवेळी ही शिकार पोट फाडून किंवा रक्त पिऊनच केली जाते असं नाही.  बऱ्याचदा त्या जनावराचं  अन्नपाणी तोडण्यात येत, त्याला अपमानाच्या आणि तिरस्काराच्या डागण्या दिल्या जातात. कधीकधी त्याला वाळीतही टाकण्यात येत. प्रचंड छळवणूक आणि मनस्तापाला कंटाळून मग ते जनावर स्वतःच आपले प्राण सोडतं. 
त्या भरकटलेल्या जनावराची कथा ऐकून मग इतर सर्व प्राणी निमुटपणे जंगलच्या कायद्याचं पालन करू लागतात आणि बघता बघता जंगल अधिकच घनदाट होत जातं...

No comments:

Post a Comment